नागपूर – राज्यातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी आता कंबर कसली आहे. वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून कॉंग्रेस हायकमांडसोबत चर्चा करू, असे धानोरकर यांनी सांगितले. तसेच मोदींविरोधातील लढाई कशी जिंकायची हे मला चांगलंच कळते, असा दावाही त्यांनी केला.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी नागपुरात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाळू धानोरकर बोलत होते. धानोरकर म्हणाले, “मी संसदेच्या अधिवेशनाला जात आहे. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर वाराणसीमधून लढण्याची माझी इच्छा आहे.
प्रियांका गांधी उत्तर प्रदेशच्या प्रभारी आहेत. अधिवेशनादरम्यान प्रियांका गांधी यांची भेट घेणार आहे. याबाबत त्यांच्याकडे विचारणा करणार असून जर त्यांनी होकार दिल्यास निवडणूक लढू. जर प्रियांका गांधी या मतदारसंघातून लढणार असतील तर हा बाळू धानोरकर पूर्ण ताकदीनिशी वाराणसीमध्ये ठिय्या मांडून बसेल, असे धानोरकर यांनी सांगितले.
खासदार देशभरात कुठूनही लढू शकतो. शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार होत आहे. 26 जानेवारीला आंदोलन झाले तरी पंतप्रधान, कृषीमंत्री, गृहमंत्री जागे होत नाहीत, याची खंत आहे. 57 टक्के शेतकऱ्यांच्या भरवशावर हा देश चालत आहे, तरी सरकार जागं होत नसेल तर सरकारला जागं करण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे.
निवडणुका हा नियोजन पद्धतीने लढायच्या असतात. निवडणूक कशी जिंकायची हे मला चांगले कळते. पहिल्यांदा निवडणूक हरलो तेव्हा मी चांगला परिपाठ शिकलो. तेव्हापासून मी कोणतीही निवडणूक हरलेलो नाही. माझ्या हातात तीन वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे काहीच कठीण नाही.
दरम्यान, याआधीही धानोरकर यांनी मोदींविरोधात लढण्याची इच्छा बोलून दाखवली होती. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढून त्यांचा ट्रम्प करू, असे धानोरकर म्हणाले होते.
राज्यातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी मोदी लाट असतानादेखील चंद्रपूर लोकसभेत भाजपचा पाडाव केला. शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये येऊन अवघ्या 15 दिवसात त्यांनी निवडणूक जिंकली होती.