पिंपरी – राजकीय पक्ष महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार की मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार यावर गेल्या अनेक दिवसांपासून खल सुरू आहे. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपविला असल्याचे जाहीररित्या सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय पटलावर चर्चेला नव्याने उधाण आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर पातळीवर पाहिल्यास महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे बाहुल्य आहे. यामुळे आघाडीचा निर्णय घेण्यात या पक्षाची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची आहे. तसेच भाजप आणि शिंदे गटात युती होऊ शकते. परंतु 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला अवघ्या 9 जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपभोवतीच महापालिका निवडणुकीचे राजकारण फिरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे सूतोवाच
महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने 36 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेला फक्त 9 जागा तर कॉंग्रेसने भोपळाही फोडला नव्हता. शिवसेनेकडून यापूर्वीच 50 जागांची मागणी करण्यात आली आहे. कॉंग्रेसकडे महापालिकेत एकही नगरसेवक नसताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये “एकला चलो” भूमिका मांडली आहे. महापालिकेतील भाजपची सत्ता घालविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आघाडी करण्याबाबत सकारात्मक पाऊले उचलली जात आहेत. मात्र, शिवसेना आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीला साथ देतात की जागांसाठी आडून बसतात. हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. दुसरीकडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी “शंभर प्लस” नगरसेवकांचा नारा दिला आहे.
युतीबाबत भाजपचे मौन
2017 मध्ये महापालिकेतील राष्ट्रवादीची एकहाती सत्ता उलथवून भाजपने सत्ता काबिज केली. त्यावेळी भाजपचे 77 नगरसेवक निवडून आले होते. प्रथमच पिंपरी महापालिकेवर कमळ फुलल्याने राज्यातील भाजप नेत्यांनी शहरावर अधिक लक्ष दिले. स्थानिक पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना ताकद दिली. पक्ष संघटना मजबूत केली. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपमध्ये अनेक विरोधाचे सूर उमटू लागले. अनेक बड्या नेत्यांनी आणि काही नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली. परंतु पुन्हा एकदा भाजपने राज्यातील सत्ता काबीज केल्यानंतर पक्षांतर्गत विरोधी सूर थंड पडले आहेत. नगरसेवक तथा नेते पक्ष सोडून जात होते त्यालाही सध्यातरी ब्रेक लागला आहे. भाजप सर्व जागा लढविण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे. परंतु रिपब्लिक पक्ष (आठवले गट) आणि शिंदे गटासोबत जागांची तडजोड करावी लागणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे भाजपकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य कोणताही नेता करत नसल्याचे दिसून येत आहे.