मुंबई :
रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपा नेत्यांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. वास्तु सजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर भाजपाकडून राज्यात आणीबाणीची आठवण करुन देणारी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका केली जात आहे. दरम्यान भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी एका जुन्या घटनेची आठवण करुन देत स्वतःला अटक करणार का? अशी विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.निलेश राणे यांनी उस्मानाबादमधील दिलीप ढवळे आत्महत्येसंबंधीच्या बातम्यांचे स्क्रीनशॉट ट्विटरला शेअर केले आहेत. कराल काय स्वतःला अटक??? न्या स्वतःला फरफटत. दाखवून द्या न्याय सगळ्यांसाठी एक असतो, असे निलेश राणे यांनी यावेळी पोस्टमध्ये म्हटले आहे.
ढवळे कुटुंबीयांनी उस्मानाबाद येथे गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन मागील वर्षभरापासून रखडलेल्या तपासावर संताप व्यक्त केला. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीची तत्परतेने दखल घेत ज्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली, अगदी तसेच आपले दिवंगत पती दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वंदना ढवळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अन्वय नाईक यांना न्याय, तर आम्ही काय घोडे मारले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत ढवळे कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना नक्की न्याय मिळेल, असे वचन दिले होते. याची आठवण वंदना ढवळे यांनी करून दिली. आर्थिक फसवणूक आणि त्यामुळे वाट्याला आलेली मानहानी यातून आपले पती दिलीप ढवळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.