थेऊर – यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भातील सर्वच शासकीय, प्रशासकीय आणि राजकीय प्रक्रिया बंद पडली असल्याने कारखान्याचे शेतकरी सभासद आता आक्रमक झाले असून विधानसभा निवडणुकीवेळी मतदानावर बहिष्कार टाकणे, उमेदवारास घेराव घालणे आदी उपक्रमातून निषेध करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. या कारखान्याचे 20 ते 22 हजार शेतकरी सभासद असल्याने कोणत्याही पक्षाला या मुद्याकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याने सत्ताधारी भाजप-शिवसेना याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी तसेच शिरूर, दौंडच्या हद्दीवरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदार ठरलेला थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना गेल्या सात ते आठ वर्षांपासून बंद पडला आहे. सुरुवातीला याच मुद्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना पक्षांनी कारखाना सुरू करण्यासंदर्भातील आश्वासने देऊन लोकसभा आणि विधानसभा निवडणूका लढविल्या आणि जिंकल्या आहेत. किंबहुना याच प्रश्नावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना नाकारून 2014 मध्ये यशवंतच्या शेतकरी सभासदांनी भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून दिले होते. त्यानंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आल्यानंतर बंद पडलेला यशवंत कारखाना सुरू होईल, अशी अशा शेतकऱ्यांना होती. परंतु, कारखान सुरू करण्यात गेल्या पाच वर्षात युतीच्या शासनाला अपयश आले आहे.
भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतरही कारखान्याचे धुराडे पेटण्याच्या आशा धूसर झाल्याने यशवंत कारखाना आता अखेरच्या घटका मोजू लागल्याचीच भावना शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. यशवंत कारखान्याच्या नावावर राजकारण करून सत्तेत आलेले आणि गेलेले लोकप्रतिनिधीही यावर मौन बाळगून आहेत. या नेत्यांना मतांचे दान देणाऱ्या शेतकरी सभासदांवरच कारखाना सुरू करण्याबाबत पुढाऱ्यांकडे भिक मागण्याची वेळी आली आहे.
किमान 20 हजार सभासदांच्या कुटुंबांशी निगडीत असलेला साखर कारखाना बंद बसताना राजकीय लोकप्रतिनिधींना याचे काहीही सोयरसुतक राहिलेले नाही. गेल्या काही वर्षांपासून फक्त यशवंत कारखान्याचा सोयीनुसार तालुक्यातील व जिल्ह्यातील पुढारी राजकीय वापर करीत आले आहे; त्यामुळे यंदा याच कारखान्याच्या मुद्यावर मत मागण्याचे धाडस कोणी कारणार नाही, अशी अटकळ बांधली जात असली तरी यशवंत कारखाना सुरू करण्याचे गाजर पुन्हा एकदा दाखवले जाणार, याची पक्की खात्री शेतकऱ्यांना आहे. यामुळेच आता या विधानसभेला कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराच्या अशा आश्वसनाला भुलायचे नाही, असा ठाम निर्धार शेतकरी सभासदांनी केला आहे. याच कारणातून निषेधाकरीता वेगवेगळे पर्याय वापरण्यात येणार असल्याने विधानसभेच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनाही यशवंत कारखाना प्रकरणावर सावध भूमिका घेतच बोलावे लागणार आहे.
कारखान्याबाबत या नेत्यांनी मारल्या थापा…
हवेली तालुक्याची एकेकाळी अर्थवाहिनी ठरलेला आणि सध्या बंद अवस्थेत असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार अजित पवार, आमदार राहुल कुल, आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांनी आश्वासने दिली होती. परंतु, गेल्या सात ते आठ वर्षात या कारखान्याबाबत कोणताच निर्णय या नेत्यांनी घेतला नसल्याने मत मागण्यासाठी आले आणि थापा मारून गेले, अशी शेतकरी सभासदांची भावना झाली आहे.