औरंगाबाद शहरातील आणखी एक महत्त्वाचा असलेला औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ युतीच्या वाट्यात शिवसेनेकडे आला आहे. 201 4मध्ये युती नसतानाही येथे शिवसेनेचे संजय शिरसाठ यांनी तब्बल 61 हजार 282 मते घेतली. तर, येथे भाजपनेही आयत्यावेळी मधुकर सावंत यांच्या रुपाने उमेदवार देत तब्बल 54 हजार 355 इतकी मते घेतली. भाजप आणि शिवसेना यांच्या वादात येथे कॉंग्रेसचे मोठे नुकसान झाले.
2009 आणि 2014 मध्ये हा मतदारसंघ कॉंग्रेसने लढविला आहे. 2009 मध्ये कॉंग्रेस उमेदवार चंद्रभान पारखे हे संजय शिरसाट यांच्या विरोधात दुसऱ्या स्थानी होते, तर 2014 मध्ये जितेंद्र देहाडे हे कॉंग्रेसचे उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिले. यंदा ही जागा मित्रपक्षाला देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, पूर्वीपासून कॉंग्रेसच्या विचारांचा या भागात प्रभाव आहे. त्यामुळे मतदारसंघ रिपाइंला देण्यात येऊ नये, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. युतीच्या जागावाटपात औरंगाबाद जिल्ह्यात मतदारसंघाची अदलाबदल करण्यात आली. भाजपकडील सिल्लोड विधानसभा मतदारसंघ शिवसेना, तर शिवसेनेचा गंगापूर मतदारसंघ भाजप लढविणार आहे. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघ शिवसेना, तर तीन मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आले आहेत.
सिल्लोडचे कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशावेळीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे सिल्लोडच्या बदल्यात भाजपला कोणता मतदारसंघ मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. मंगळवारी शिवसेना आणि भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानुसार सिल्लोड व गंगापूर मतदारसंघाची अदलाबदल झाल्याचे स्पष्ट झाले. या मतदारसंघातून अनेकवेळा कॉंग्रेसने विजय मिळविला आहे; पण 2009 पासून हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यावेळी कॉंग्रेसने युतीच्या उमेदवाराला चांगली लढत दिली.
2014 मध्ये आघाडी न झाल्याने कॉंग्रेसची पीछेहाट झाली होती. त्यामुळे पक्षातील काहीजण हा मतदारसंघ रिपाइंला सोडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. येथून कॉंग्रेसच्या 12 जणांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे त्यापैकी योग्य उमेदवार निवडण्यात यावा, रिपाइंला जागा सोडण्यात येऊ नये, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, मागच्या निवडणुकीत आयत्यावेळी उमेदवार देऊनही भाजपने येथून चांगली लढत दिली. त्यामुळे युती जाहीर होण्यापूर्वी अनेकांनी तयारी केली होती. त्यामुळे भाजपचे इच्छुक शिवेसेनेला मदत करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.