पुणे -करोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानुसार वारीची परंपरा जपण्यास मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांनी मान्यता दिली आहे. एसटी बसने पालखी पंढरपूरपर्यंत नेण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे. पालखी सोहळा प्रमुखांनी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
वारकऱ्यांनी केलेल्या मागणीबाबत प्रशासन पूर्णत: सकारात्मक असून, याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर करणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.
विधानभवन येथे शुक्रवारी वारीच्या नियोजनबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीस मानाचे पालखी सोहळा प्रमुख उपस्थित होते. मागील वर्षीही करोना संकटामुळे पालखी एसटीने पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या.
मागील वर्षी फक्त 20 वारकऱ्यांनाच परवानगी दिली होती. यंदा एका पालखी सोबत 60 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे, तर प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकरी यांना परवानगी देण्यात आली आहे. पालखी सोबत जाणाऱ्या वारकऱ्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. ज्या वारकऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अथवा लसीचा एक डोस घेतला आहे. त्यांना वारी करण्यास परवानगी देण्याचा विचार आहे.
दरम्यान, आज झालेल्या बैठकीत शासनाने वारीसंदर्भात नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्याबाबतचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून मांडण्यात आले. वारकरी यांच्या मनातील काही प्रश्न होते. त्या प्रश्नांचे निरसण प्रशासनाकडून करण्यात आले. यावेळी वारकरी बांधवांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्या शासनाकडे पोहोचविण्यात येईल व याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून यावेळी व्यक्त करण्यात आली.