नवी दिल्ली : करोना विषाणूच्या साथीचा भारताला जाणवणारा धोका अधिक असल्यामुळे सरकारने त्याविरोधातील उपाय योजनांसाठी अधिक मनुष्यबळाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी सध्या सुरू असलेल्या विविध कामांसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या ऐवजी अन्य व्यक्तींचा सहभाग करून घेण्यात येणार आहे.
या मनुष्यबळाला आवश्यक ते प्रशिक्षण ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाणार आहे. “सर्वांना ठाऊक आहे की, “कोविड -19′ या साथीच्या आजारामुळे भारताला जास्त धोका आहे. भारताची कामगारांची पहिली फळी यापूर्वीपासून करोना मुक्तीच्या कामामध्ये सक्रिय आहे आणि अत्यंत प्रशंसनीय काम करत आहे. याची दखल घ्यावीच लागेल.
मात्र आता या पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना बदलावे लागेल. तसेच करोनाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये होणारी संभाव्य वाढ रोखली गेली पाहिजे, असे कार्मिक मंत्रालयाच्या आदेशामध्ये म्हटले आहे. मात्र देशाला कोणत्या परिस्थितीत जास्त धोका आहे, या संदर्भात या आदेशात तपशीलवार माहिती देण्यात आली नाही. विविध आघाड्यांवरील कामगारांच्या प्रशिक्षणासाठी, एकात्मिक शासकीय ऑनलाइन प्रशिक्षण प्लॅटफॉर्मची वेगाने सुरूवात केली गेली आहे आणि या गरजा पूर्ण करणाऱ्या “आय जीओटी’ची आवृत्ती सुरू केली गेली आहे, असे त्यात म्हटले आहे.
या प्लॅटफॉर्मवर सोयीनुसार कालावधीतेल प्रशिक्षण मॉड्यूल उपलब्ध असेल. “आय जीओटी’वर डॉक्टर, नर्स, पॅरामेडिक्स, स्वच्छता कामगार, तंत्रज्ञ, सहाय्यक नर्सिंग मिडवाइव्ह्स, राज्य सरकारी अधिकारी आणि नागरी संरक्षण अधिकाऱ्यांसह इतर अनेकांसाठी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. हे ऑनलाईन प्रशिक्षण मोड्युल विविध पोलिस संस्था, एनसीसी, नेहरू युवा केंद्र संघटना, राष्ट्रीय सेवा योजना, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, भारत स्काऊट्स – गाईड्स आणि या टप्प्यावर इतर स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संघटनांसाठी उपलब्ध आहेत.
करोनाच्या साथीचा प्रभावीपणे मुकाबला करता यावा, यासाठी “आय जीओटी’या प्लॅटफॉर्मवर अधिक संख्येने आपल्या सदस्यांना सहभागी करून घ्यावे आणि ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कार्मिक मंत्रालयाने सर्व संबंधित संघटनांना केले आहे.