पाटणा – बिहारला विशेष राज्याचा दर्जा न मिळाल्याबद्दल राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. विशेष दर्जा देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येणार का, असा सवाल तेजस्वी यांनी केला.
नितीश यांनी वारंवार बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारांकडे केली. मात्र, बिहारमध्ये 15 वर्षे सत्तेत राहूनही नितीश ते करू शकले नाहीत. मोदी यांनीही बिहारला विशेष दर्जा बहाल करण्याचे आश्वासन दिले होते, असे तेजस्वी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ते वक्तव्य करताना त्यांनी भाजप-जेडीयूचा समावेश असलेली एनडीए केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असल्याकडे लक्ष वेधले.
तेजस्वी यांना विरोधकांच्या महाआघाडीने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनवले आहे. मात्र, ते अननुभवी असल्याची खिल्ली एनडीएकडून उडवली जात आहे. त्याचा समाचार घेताना तेजस्वी यांनी विकासाच्या दृष्टीचा संबंध वयाशी नसल्याचे म्हटले. बिहारमधील नितीश सरकारने जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्या सरकारच्या कार्यकाळात 60 हून अधिक घोटाळे झाले, असा आरोपही त्यांनी केला.