पुणे -कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. धंगेकर यांच्या विजयामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे यांची शिवसेना यांचा मोठा वाटा आहे. यावरून आता संजय राऊत यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यात टीका केली आहे.
माध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले,’कसबा पेठ विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या ३५ ते ४० हजार मतांच्या बळावर भाजप सतत निवडून येत होती. चिन्ह व पक्ष ज्यांच्याकडे गेले त्यांच्याकडे ती मते असती, तर तिथे भाजप हरली नसती. हा कल पाहता चंद्रकांतदादा पाटील कोथरूडमधून लढतील का, हे त्यांना विचारावे लागेल. चंद्रकांतदादा, टोपी संभालो,’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
दरम्यान, कसब्यातील भाजपचा हा पराभव केवळ कसब्यापुरताच मर्यादित नाही तर या निकालाने संपूर्ण महाराष्ट्रालाच भाजपचा भ्रमाचा भोपळा कसा फोडायचा याचा उत्तम संदेश दिला आहे . महाराष्ट्रात आणि देशातही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात किती तीव्र असंतोष खदखदत आहे , हेच कसब्याच्या निकालाने दाखवून दिले . एकास एक उमेदवार दिला तर भाजपचा पराभव करणे सहज शक्य आहे . जागरूक झालेल्या मतदारांनी त्यांचे काम चोख बजावले . आता जबाबदारी विरोधी पक्षांची आहे . आपल्यात वजाबाकी होऊ न देणे आणि मतांची बेरीज वाढवणे हाच भाजपच्या पराभवाचा एकमेव मंत्र आहे . कसब्याच्या निकालाचा हाच अर्थ आहे . कसब्याच्या निकालाने पुण्यात जल्लोष सुरू झाला आहे . महाराष्ट्रात आणि देशातही 2024 पर्यंत हा जल्लोष असाच सुरू राहील ! असाही विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.