दुबई – भारत व पाकिस्तान यांच्यात थांबलेल्या द्विपक्षीय मालिका पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोन संघात पुन्हा एकदा सातत्याने सामने सुरू व्हावेत, यासाठी बीसीसीआय व पाकिस्तान क्रिकेट मंडळाने या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली असून, आता भारत सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेल्या संबंधांमुळे या दोन देशांच्या मालिकांना मनाई करण्यात आली होती. हे दोन संघ केवळ आयसीसीच्याच स्पर्धांमध्ये एकमेकांविरोधात खेळतात.
मात्र, आता येत्या काळात आशिया करंडक स्पर्धा पाकिस्तानात होणार असून, त्यासाठी भारतीय संघही पाकिस्तानचा दौरा करण्याची शक्यता बळावली आहे. असे झाले तर 2008 सालानंतर भारतीय संघ प्रथमच पाकिस्तानचा दौरा करेल.
आशियाई क्रिकेट समितीच्या बैठकीत पाकिस्तानला 2023 साली होणाऱ्या एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. 2023 सालचा एकदिवसीय विश्वकरंडक भारतात होणार आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान संघ या स्पर्धेसाठीही भारतात येणार आहे.