गुवाहाटी : आसाममधील सत्तारूढ भाजपचे अनेक आमदार पक्ष सोडण्याच्या मूडमध्ये असल्याचा दावा कॉंग्रेसचे खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी शनिवारी केला. तो खरा ठरल्यास त्या राज्यात आगामी काळात मोठ्या राजकीय उलथापालथी घडण्याची चिन्हे आहेत. आसाममध्ये भाजपकडून सर्व काही आलबेल असल्याचे दाखवले जाते. मात्र, त्या पक्षातील इनसाईड स्टोरी वेगळीच आहे.
भाजपमधील जुने नेते आणि त्या पक्षात नव्याने दाखल झालेले नेते यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांच्या समर्थकांचा प्रभाव आणि कार्यशैली जुन्या नेत्यांना रूचत नाही, असे बोरदोलोई यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. भाजपचे अनेक आमदार कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत. काहींनी माझ्याशीही संपर्क साधला. त्यांची कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे.
त्यासंदर्भात आमच्या पक्षात विचारविनिमय सुरू आहे. लवकरच कॉंग्रेसचा निर्णय होईल, असेही त्यांनी नमूद केले. आसामचे मुख्यमंत्री सर्मा हे स्वत: मूळचे भाजपचे नाहीत. काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसचा हात सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, भाजपने बोरदोलोई यांचा दावा फेटाळून लावला. आमच्यातील कुणीही कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही, असा विश्वास त्या पक्षाने व्यक्त केला.