मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. कोरोनाचे सावट वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आज 11 सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत केंद्रीय कॅबिनेट सचिवांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असताना जनतेत लॉकडाऊनची धास्ती कायम आहे. गेल्या वर्षभराच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यात महाराष्ट्रात कोरोना आकड्यांनी नवा उच्चांक गाठला.
जवळपास 6.6 लाख कोरोनाग्रस्त आढळून आले असून तब्बल 400% वाढ फक्त एका महिन्यात नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत लॉक डाऊन ‘टू बी ऑर नॉट टू बी’ असा यक्षप्रश्न ठाकरे सरकार समोर उभा टाकला आहे.
मात्र लॉक डाऊन करण्यावरून ठाकरे सरकारमध्येच मतभेद समोर आले आहेत. तर दुसरीकडे आनंद महिंद्रा सारख्या मोठ्या उद्योगपतींपासून ते हातावर पोट असलेल्या गोर गरीब मजुरांपर्यंत अशा सर्व स्तरातून लॉकडाऊनच्या विरोधात सूर आवळलेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनला पर्याय म्हणून कडक निर्बंधांसह ‘मिनी लॉकडाऊन’ चा विचार सध्या सरकार दरबारी सुरू आहे.