नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा करोनाने परिस्थिती चिंताजनक करून सोडली आहे. राज्यांमध्ये नेमकी काय स्थिती आहे तसेच काय उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांसोबतच तज्ञांसोबतही चर्चा करत आहे. महाराष्ट्रात कडक निर्बंध असताना दिल्लीत सहा दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. दरम्यान काही राज्यांनी परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवरही निर्बंध आणले आहेत. यादरम्यान अनेकांना प्रवासी रेल्वे सेवा सुरु राहणार की बंद होणार अशी चिंता सतावत आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सर्व प्रवासी रेल्वे नेहमीप्रमाणे सुरु असतील असे स्पष्ट केले आहे. रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत माहिती दिली असून घाबरण्याची किंवा अंदाज बांधण्याची कोणतीही गरज नसल्याचे म्हटले आहे. प्रवासी तिकीट बूक करुन आरामशीर आणि सुरक्षितपणे इच्छित स्थळी प्रवास करु शकतात असे रेल्वेने म्हटले आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळले जातील असे स्पष्ट करताना रेल्वेने नागरिकांनी तिकीट कंफर्म असेल किंवा आरक्षण असेल तरच रेल्वे स्थानकावर यावे अशी विनंती केली आहे.
दरम्यान अनेक राज्यांनी रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्बंध वाढवले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आल्याचं सांगत सोमवारी एका आठवड्यासाठी लॉकडाउन जाहीर केला. तर राजस्थानमध्येही दोन आठवड्यांचा लॉकडाउन लावण्यात आला आहे. तसेच गुजरात, उत्तर प्रदेश आणि तेलंगणात न्यायालयाने राज्य सरकारला लॉकडाउनसंबंधी विचार करण्यास सांगितले आहे.