पुणे – विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी पसंतीक्रमानुसार मतदानाची (प्रेफरन्शियल व्होटिंग) पद्धत बंद करावी, असा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालय निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहे. ही पद्धत वेळखाऊ असून संपूर्ण महसूलयंत्रणा वेठीस धरली जाते, असे यंदाच्या निवडणुकीत आढळून आले आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी पुण्यात दोन जागांसाठीची मतमोजणी तब्बल 26 ते 36 तास सुरू राहिली. त्यासाठी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांसह पाचही सुमारे अडीच हजार कर्मचारी अडकून राहिले. एकापेक्षा अधिक उमेदवारांना निवडून देण्याची गरज असल्यास पसंतीक्रमाची पद्धत राबवण्यात येते. परंतु, येथे पदवीधर आणि शिक्षक या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एकच उमेदवार निवडून येतो. त्यामुळे त्यासाठी पसंतीक्रमाच्या पद्धतीची गरज नाही, असे आढळून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक ईव्हीएमवर घेण्यात यावी, असा प्रस्ताव पाठवणार आहे.
सध्या एखाद्या मतदारसंघात जितके उमेदवार असतील, तेवढ्या पसंतीक्रमाची मते देण्याची मुभा आहे. यंदा पदधीधरसाठी 62, तर शिक्षकसाठी 35 उमेदवार रिंगणात होते. मतदानाची वाढलेली टक्केवारी व उमेदवारांची मोठी संख्या यामुळे मतमोजणीसाठी वेळ लागला. पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराने विजयाचा आवश्यक कोटा पूर्ण केल्याने 26 तासांत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली. तर शिक्षक मतदारसंघातील कोणत्याही उमेदवाराने विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केला नाही. त्यामुळे मतमोजणीसाठी तब्बल 36 तास लागले. यासाठी सलग तीन दिवस महसूल यंत्रणा काम करत होती.
एकच मत देण्याची पद्धत लागू व्हावी
विजयासाठी मतदानापैकी पन्नास टक्के मतांचा कोटा ठरवण्यात येतो. पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांच्या मोजणीत कोणत्याही उमेदवाराने हा कोटा पूर्ण केला नाही, तर दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीक्रमाची मते मोजण्यात येतात. सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवारांच्या मतांपैकी पुढील पसंतीक्रमाची मते मोजली जातात. या पद्धतीने कोटा पूर्ण होईपर्यंत मतमोजणी सुरू राहते आणि अंतिमतः कोणीही कोटा पूर्ण केला नाही, तर सर्वाधिक मते मिळविणाऱ्या उमेदवारास विजयी म्हणून घोषित करण्यात येते. इतका मोठा वळसा घेण्याऐवजी एकच मत देण्याची पद्धत लागू केल्यास निवडणूक सुटसुटीत होईल, असा यंत्रणेचा अनुभव आहे.
पसंतीक्रमाचे बंधन असावे
शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी मतपत्रिकेवर पसंतीक्रमानुसार मतदान केले जाते. जेवढे उमेदवार असतील, तेवढे पसंतीक्रम असतात. 50 उमेदवार असतील काही मतदार 50 उमेदवारांच्या पुढे पसंतीक्रम लिहतात. सर्वच उमेदवारांच्या पुढे पसंतीक्रम लिहतात. अशा मतदानाचे प्रमाण यंदा 5 टक्के होते. तर बहुतेक मतदारांनी एक ते पाचच पसंतीक्रम लिहले. अशा पद्धती ऐवजी फक्त पहिले तीनच पसंतीक्रम देण्याचे बंधन ठेवण्यात यावे, असे यंत्रणेचे मत आहे.