मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर विरोधक नाराजी व्यक्त करत असून टीका करत आहेत. दरम्यान सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. एकाच दिवशी आलेले निकाल सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत असं ते म्हणाले आहेत. त्यांनाही महाराष्ट्रद्रोही ठरवणार का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन महापालिकेला फटकारले. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी अटकेवरुन ठाकरे सरकारला फटकारलं आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एकाप्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत. आता प्रश्न असा आहे की, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का?”.
एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एकप्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत.
आता प्रश्न असा आहे की, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्धा हे ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का?— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 27, 2020
सत्तेतील नेते सत्तांध झाल्याने ज्या घटना अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडल्या, त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल ही सरकारला सणसणीत चपराक आहे. सरकारविरोधी निघणारा प्रत्येक आवाज हा अशाप्रकारे चिरडून टाकता येत नसतो, हे आता तरी त्यांनी लक्षात घ्यावे!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 27, 2020
“आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे, याचा विसर या राज्य सरकारला पडला. पोलिस, फौजदारी कायदे हे जनतेच्या संरक्षणासाठी असतात, त्यांच्या छळवणुकीसाठी नाहीत, हे जर न्यायालयांना सांगावे लागत असेल, तर आपली सदसदविवेक बुद्धी-संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का,हा प्रश्न निर्माण होतो,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“सत्तेतील नेते सत्तांध झाल्याने ज्या घटना अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडल्या, त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल ही सरकारला सणसणीत चपराक आहे. सरकारविरोधी निघणारा प्रत्येक आवाज हा अशाप्रकारे चिरडून टाकता येत नसतो, हे आता तरी त्यांनी लक्षात घ्यावे,” असंही ते म्हणाले आहेत.