कात्रज आणि परिसरातील पाणी प्रश्नावर तलावांचा उपयोग करण्याची मागणी
पुणे – शहराच्या दक्षिण भागातील कात्रज आणि परिसरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी या भागात असलेल्या तीन पाझर तलावांचा वापर करावा, तेथे पाणी शुद्धीकरणाचे छोटे प्रकल्प राबवून, त्याभागाला हे पाणी द्यावे, अशी मागणी मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.
अंदाजपत्रक सादर करताना महापालिकेने पाणी पुरवठ्यासाठी धरण खरेदी करण्याची सूचना केली. या सूचनेचे मनसेने स्वागत केले आहे. परंतु धरण खरेदी करणे हे वस्तूत: शक्य नाही, मात्र तलावाच्या रुपात अस्तित्त्वात असलेल्या पाणीसाठ्याचा उपयोग करून घेता येईल, याकडे मोरे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही संकल्पना सांगितली. यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर उपस्थित होते.
शहराच्या दक्षिण भागात पाच पाझर तलाव आहेत. यामध्ये कात्रज येथे दोन तलाव आहेत. तर भिलारेवाडी, आंबेगाव खुर्द, जांभुळवाडी येथे एकूण तीन तलाव आहे. या पाचपैकी भिलारेवाडी, आंबेगाव खुर्द येथील तलावाचा ताबा हा राज्य सरकारकडे आहे. तर जांभुळवाडी तलावाचा 93 एकरांचा परिसर समाविष्ट झाल्यामुळे महापालिकेच्या मालकीचा झाला आहे.
मूळ अडचण काय?
शहराचा दक्षिण भाग हा चढावर असल्याने पर्वती जलकेंद्रातून या भागात पाणी पुरवठा करण्यासाठी ते लिफ्ट करावे लागते. यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज खर्च होतो. तो वाचण्याला यामुळे मदत होईल. चार ते सहा महिने या भागात या दोन तलावातून पाणी मिळाले तर शहरातील पाणी पुरवठा सुधारण्याला मदत होऊ शकते, असा दावाही मोरे यांनी केला आहे.
…तर 6 महिने पुरेसे पाणी
भिलारेवाडी तलावाच्या पाणीसाठा क्षेत्रात अद्याप बांधकामांची संख्या कमी आहे. या दोन्ही तलावांची साठवण क्षमता वाढवली पाहिजे. या तलावातील पाणी शुद्ध करण्यासाठी केंद्र उभारून त्याद्वारे शहराच्या दक्षिण भागातील कात्रज, कोंढवा, आंबेगाव, नऱ्हे आदी भागात पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. या तलावातून सुमारे चार ते सहा महिने पाणी उपलब्ध होऊ शकते, असे यावेळी सांगण्यात आले.