नवी दिल्ली – “छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांची हकालपट्टी करावी,’ अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. याच संदर्भात उदयनराजे भोसले यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या भेटीनंतर उदयनराजे यांनी पंतप्रधान कार्यालयाला एक पत्र दिलं असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्यपाल पद हे संवैधानिक पद असल्याने त्या पदावरून हटवण्याबाबतच्या काही प्रक्रिया असतात. त्या पूर्ण करूनच राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून कारवाई केली जाते. त्यामुळे राज्यपालांवर कारवाई होईल, अशी मला आशा आहे, असं उदयनराजे म्हणाले.
त्या पत्रात नमूद केलं आहे की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला होता. त्यामुळे त्यांना हटवण्यासाठी 23 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं. शिवाजी महाराजांचा राज्यपालांनी अवमान केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र असून राज्यात ठिकठिकाणी निदर्शने होत आहे, असं त्या पत्रात नमूद केलं होतं, अशी माहिती उदयनराजे यांनी दिली.