पुणे – जिल्ह्यात दबदबा असणाऱ्या शिवसेनेची 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठी वाताहत झाली आहे. त्यामुळे शिवसैनिकांना मरगळ आली आहे. शिवसेनेची वाताहत थांबवण्यासाठी किमान आतातरी जिल्ह्यातून शिवसैनिकास राज्यपाल नियुक्त आमदारकी देऊन जिल्ह्यातील “धनुष्या’स बळ द्यावे, असे साकडे शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले आहे.
जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार सोडला तर एकही लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे शिवसैकांची मोठी कोंडी होत आहे. जरी मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खासदार, आमदारांच्या शिडीची गरज असते; मात्र यापूर्वी राज्यसभा, विधानपरिषदेलाही जिल्ह्यातील एकाही शिवसैनिकाची वर्णी लागली नाही. किमान आता तरी विधानपरिषद देऊन शिवसैनिकांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्याची नामी संधी चालून आली आहे. तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांनी त्यांना साकडे घातले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आलेल्या आपत्तीबाबत शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांकडे दाद मागितली; मात्र लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकाऱ्यांनी दाद लागू दिली नाही. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाविकास आघाडीत तीनही पक्षांना समान स्थान आहे, असे सांगितले जाते; मात्र निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दौरा केला.या दौऱ्यात केवळ एकाच पक्षाचे नेते, कार्यकर्ते दिसले.
त्यावेळी परिसरातील इतर दोन्ही पक्षांच्या नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची त्यांना आठवण झाली नाही का? फक्त वरवर हे तिहेरी पक्षांची सत्ता असल्याचा आव आणायचा का? अशा भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ही आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी राज्यपाल नियुक्त आमदारकी जिल्ह्याला मिळावी, अशी मागणी शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असून ते याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा
जिल्ह्यात शिवसैनिकांना बळ मिळावे यासाठी शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राज्यपाल नियुक्त आमदार करावे, अशी मागणी मध्यंतरीच करण्यात आली आहे. पण आढळराव पाटील यांना उपनेते पद दिले असून ते सध्या तळागाळात काम करीत आहेत. जिल्ह्याला आमदारकी दिलीच तर त्यांची वर्णी लावणार की, नवीन चेहरा समोर येणार हे पाहावे लागणार आहे.
राष्ट्रवादीमुळे कोंडी?
राज्यात सध्या शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यात जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीला, तर भोर, पुरंदर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला शिवसेना तोडीसतोड टक्कर देण्यात समर्थ आहे; मात्र सध्या तीनही पक्ष एकत्र असल्याने शिवसैनिकांची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी जिल्ह्यात कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेची कोंडी करू शकतो, असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे हा अंदाज खरा ठरणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
जिल्ह्यात शिवसैनिकांना बळ मिळावे तसेच जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या हक्काचा एकतरी माणूस विधानसभेत असावा, पक्षाला बळकटी मिळावी म्हणून राज्यपाल नियुक्त आमदारकी मला मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. तरी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष जो निर्णय घेईल तो एकदिलाने मान्य करणार आहे.
– शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार तथा उपनेते, शिवसेना