पुणे- लॉकडाउन काळात जवळपास नगण्य झालेले हवेचे प्रदूषण, अनलॉकमध्ये वाढत आहे. तर, दिवाळीतील फटाक्यांमधून निर्माण होणारा धूर हवा प्रदूषणात अधिक भर घालेल. करोनामुळे श्वसन संस्थेवर झालेल्या परिणामांनंतर वाढत्या हवा प्रदूषणाचा सामना नागरिकांना करावा लागू शकतो, अशी भीती पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत.
“लॉकडाऊन काळात शहराच्या हवेची गुणवत्ता आश्चर्यकारक प्रमाणात सुधारली होती. एप्रिल ते सप्टेंबर या काळात हवेतील हानीकारक घटकांचे प्रमाण अगदी एक अंकी पातळीवर पोहचले होते. वाहतूक आणि उद्योगांवरील बंदीचे चांगले परिणाम पर्यावरणावर झाले. या काळात श्वसन विकाराच्या रुग्णांना औषधाचे “डोस’ कमी करावे लागले होते,’ अशी माहिती फुफ्फ्सरोगतज्ज्ञ डॉ. नितीन अभ्यंकर यांनी दिली आहे.
एप्रिल ते सप्टेंबर काळात “उत्तम’ असलेली पुण्याची हवा ऑक्टोबरमध्ये “समाधानकारक’ झाली आहे. शहरात हवा प्रदूषणात किंचित वाढ झाल्याचे निरीक्षण राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदवली आहे. ही वाढ प्रमाण मर्यादेपेक्षा कमी असली, तरी भविष्यात हे प्रमाण धोकादायक पातळी गाठण्याची शक्यता आहे.
लॉकडाउन काळात हवेतील हानिकारक घटकांचे प्रमाण (दर क्युबिक घनमीटरप्रमाणे)
महिना प्रमाण (सरासरी)
एप्रिल 27
मे 18
जून 06
जुलै 13
मंगळवारी असलेले हानिकारक घटकांचे प्रमाण (दर क्युबिक घनमीटरप्रमाणे)
पीएम 10 – 115
पीएम 2.5 – 71
राज्य सरकार फटाक्यांवर बंदी घालणार का?
राजस्थान सरकारने सोमवारी (दि.2) फटाकेबंदीचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही सरकार असा निर्णय घेईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि हवा प्रदूषणाचे विपरित परिणाम मानवी आरोग्यावर होतात. शिवाय फटाकेनिर्मिती कारखान्यांमध्ये बालमजुरांचा वापर होतो. या दोन्ही बाबी लक्षात घेत, फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी सातत्याने होत आहे. राजस्थानप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही फटाका उत्पादन आणि विक्रीवर संपूर्ण बंदी घालावी. तसेच ही बंदी कायमस्वरूपी असावी, अशी मागणी सोशल मीडियातून होत आहे.