भोपाळ :– मध्य प्रदेशात तीन वर्षांपूर्वी कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारचे झाले तसेच आता शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या सरकारचे होणार का असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यावेळी म्हणजे कॉंग्रेसचे सरकार असताना ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी केलेल्या बंडखोरीमुळे कॉंग्रेसचे सरकार गडगडले होते. आता त्याच शिंदे यांच्या समर्थकांनी पुन्हा तोच पवित्रा स्विकारला आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सामूहिक राजीनामा देण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शिवराज यांचे सरकारही त्याच वाटेने जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. पक्षाचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे पुत्र दीपक जोशी यांनी राजीनामा दिला आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमधील मंत्री गोपाल भार्गव, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असलेले राज्य सरकारमधील मंत्री गोविंद सिंह राजपूत आणि मध्य प्रदेशचे परिवहन मंत्री भूपेंद्र सिंह या बुंदेलखंड भागातील नेत्यांमध्ये कलह सुरू आहे. त्याच्या तक्रारी चौहान यांच्यापर्यंतही पोहोचल्या आहेत.
काय आहे इतिहास
मध्य प्रदेशात पंधरा वर्षांच्या वनवासानंतर कॉंग्रेसचे सरकार आले होते. कमलनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. आपल्याला पक्षात योग्य सन्मान मिळत नसल्याची तक्रार करत ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेसला रामराम केला. त्यांच्या सोबत त्यांचे सहा समर्थक मंत्री आणि आमदारांनीही कॉंग्रेसला टाटा केला. सरकार स्थापन होऊन केवळ दीडच वर्षांत हे नाट्य घडले आणि कॉंग्रेसला सत्ता गमवावी लागली व भाजपचे राज्यात सरकार आले.
आता बुंदेलखंड भागात भाजपमध्ये तोच प्रकार सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीला केवळ सहा महिन्यांचा अवधी आहे. मंत्री भार्गव, राजपूत यांनी काही आमदारांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत त्या सगळ्यांनी राज्याचे नगरविकास मंत्री भूपेंद्र सिंह यांची तक्रार केली. भूपेंद्र यांना विचारल्याशिवाय कोणतेच काम होत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार भूपेंद्र सिंह यांच्यावर नाराज असलेल्या मोठ्या गटाने आता सामूहिक राजीनामा देण्याची तयारी केली आहे. चौहान यांची भेट घेतल्यानंतर नाराज गटाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. वर्मा, संघटन महामंत्री हितानंद यांचीही भेट घेतली. जर आमचे म्हणणे येथे ऐकले गेले नाही तर आम्ही दिल्लीला जाऊ असा इशारा गटाने दिला आहे. मंत्र्यांमधील हा अंतर्गत संघर्ष भाजपसाठी डोकेदुखी ठरतो आहे.