सातारा -दिल्लीतील केजरीवाल सरकारने दिल्लीकरांना एक नवा दिलासा दिला. चोवीस तास वीज नंतर आता चोवीस तास पाणी देण्याचा दिलासादायक निर्णय आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केला. करोना संकट काळात जनतेला दिलासा देणारा हा निर्णय सध्या संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कौतुकाचा विषय ठरू लागला आहे. महाराष्ट्रात मात्र निर्णयावाचून वीजबिलप्रश्न आजही प्रलंबित आहे. सातारा जिल्ह्यात सध्या जनमानसात दिलासादायक निर्णयांसाठी सरकार “आप’चेच पाहिजे अशी भावना तयार होताना दिसत असल्याचे, मत आपचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर यांनी व्यक्त केले.
राज्यात विशेषत: सातारा जिल्ह्यात करोना संकट अधिक गडद होत असताना राज्य शासन मात्र सुशांतसिंह प्रकरणातून बाहेर पडायला तयार नाही. विरोधक सरकार पाडण्याची स्वप्न पाहत आहेत, पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत, मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहण्यासाठी मागील सरकार जबाबदार आहे, असे अनेक प्रतिदावे करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून उत्पन्नाचे मार्ग बंद असतानाही आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेने विज बिल भरावे ही अपेक्षा म्हणजे राज्य सरकारच्या संवेदनाहीन विचारांचा परिपाकच म्हणावा लागेल, असे सागर भोगावकर यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
दिल्लीत जर अरविंद केजरीवाल मोफत वीजेची यशस्वीपणे अंमलबजावणी करू शकत असतील तर महाराष्ट्रात याबाबत निर्णय घेण्यास सरकारला का उशीर होतोय? असा सवालही सर्वसामान्यांना पडला आहे. किमान पाच महिन्यांचे विज बिल माफ करण्याचा निर्णय घेण्याचे धाडस राज्य शासन दाखवणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.