बारामती- बारामतीच्या त्या 42 गावांनी असे काय पाप केले आहे की ते पाण्यापासून अद्यापही वंचित आहे, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बारामती येथे उपस्थित केला. आम्ही सत्तेचा चंग बांधला असून सत्तेत आल्यास पाण्याचा प्रश्न सोडणार असल्याची ग्वाही देत बारामतीकरांनी सावध राहावे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बारामती जिल्हा होणार याची चर्चा गेल्या 20 वर्षांपासून मी ऐकत आहे. पाणी कुठून कस पळवल गेल, याचीही मला जाणीव आहे. तरीही 42 गावे पाण्यापासून वंचित आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्या 42 गावांना पाणी आले असते अशी परिस्थिती असताना देखील ही गावे वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित आहेत. या 42 गावांनी काय पाप केलय हे माहिती नाही. टाटा माध्यमातून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. सत्तेत आलो तर वीजनिर्मिती ऐवजी शेतीसाठी व पिण्यासाठी या गावांना पाण्याची सोय करू, अशी ग्वाही देखील आंबेडकर यांनी यावेळी दिली.