तिरुवनंतरपुरम – कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले ज्येष्ठ नेते शशी थरूर हे लवकरच कॉंग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा आहे. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. यामुळे केरळमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याबाबत केरळमधील राष्ट्रवादीचे अध्यक्ष पी. सी. चाको यांनीही तसे संकेत दिले आहेत.
कॉंग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यापासून शशी थरूर यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची बोलले जात आहे. मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष झाल्यानंतर थरूर यांना मोठ्या निर्णयांपासून दूर ठेवले जात असल्याने थरूर नाराज आहेत. कॉंग्रेस पक्षाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि थरूर एकमेकांविरोधात रिंगणात उतरले होते. खर्गे यांनी कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. त्यानंतर थरूर यांना कॉंग्रेसच्या विविध उच्चस्तरीय समित्यांमध्येही स्थान मिळाले नाही.
या पार्श्वभूमीवर कन्नूरमध्ये राष्ट्रवादीचे केरळमधील अध्यक्ष पी. सी. चाको म्हणाले, कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू. तसेच कॉंग्रेस पक्षाने त्यांना नाकारले तरी शशी थरूर हे तिरुवनंतपुरमचे खासदार म्हणून कायम राहतील.
कॉंग्रेसकडून थरूर यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे, याची मला कल्पना नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेशाची शक्यता शशी थरूर यांनी फेटाळली. आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार नाही. पी. सी. चाको यांच्याशी यासंदर्भात माझी कोणतीही चर्चा झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.