मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या शिंदे गट आणि भाजपामध्ये सध्या मंत्रीपदावरून नाराजी असल्याचे बोलले जात आहे. या नाराजांमध्ये शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या नावाचाही उल्लेख आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत शिंदे गट आणि भाजपाच्या सर्व आमदारांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमाला शिरसाट गैरहजर राहणार असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत शिंदे गट आणि भाजपाच्या सर्व आमदारांसाठी स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला शिंदे गटाचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. मात्र, संजय शिरसाट यांनी या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय शिरसाट यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आपण नाराज नसल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. “तसं काहीही नाही. हा गैरसमज आहे. मी परवा एकनाथ शिंदेंना भेटलो. मतदारसंघातल्या कार्यक्रमांसाठी पूर्वपरवानगी घेतली जाते. तशी परवानगी मी घेतली आहे. मी कुठेही नाराज नाही. मतदारसंघातल्या कार्यक्रमासाठी मी त्यांची परवानगी घेतली आहे. त्यांनी परवानगी दिली नसती, तर मी नक्कीच त्या कार्यक्रमाला गेलो असतो”, असे शिरसाट यावेळी म्हणाले.
“मंत्रीमंडळ विस्तारावर आम्ही अजिबात चर्चा केली नाही. जेव्हा तो व्हायचा, तेव्हा तो होईल. त्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. नाराजी हा भाग माझ्यासाठी आता संपलेला आहे. जो निर्णय एकनाथ शिंदे घेतील, तो मला मान्य असेल”, असेही शिरसाट यांनी यावेळी म्हटले.