मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना जामीन मिळणार की त्यांचा तुरुंगातला मुक्काम वाढणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 4 ऑगस्टपर्यंतच्या कोठडीत वाढ करत त्यांना 8 ऑगस्टपर्यंतकोठडी सुनावली होती. दरम्यान, संजय राऊत यांची ईडी कोठडी आज संपणार आहे. आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे त्यांना आज जामीन मिळणार की तुरुंगातच राहावे लागणार याविषयीचा निर्णय आज न्यायालयात होणार आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत ईडीच्या अटकेत आहेत. 31 जुलै रोजी अनेक तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर न्यायलयाने राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. राऊतांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली. शनिवारी वर्षा राऊत यांचीही जवळपास 10 तास ईडीकडून चौकशी झाली.
संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली होती, पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केले आहे, आठ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय? असा सवालही उपस्थित केला होता. त्यावर कोर्टाने ईडीची विनंती अमान्य करत त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. त्यानंतर ईडीने आज पुन्हा एकदा कोठडी 10 ऑगस्टपर्यंत वाढवून मागितली होती. परंतु संजय राऊत यांचे वकील अॅड. मनोज मोहिते जिरह यांनी ईडीच्या मागणीला विरोध केला. परंतु कोर्टाने त्यांची कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढवली.
ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचे नाव सुरुवातीला समोर आले होते आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते असं ईडीने न्यायालयात सांगितले.