पुणे – विद्यार्थीदशेत युवकांमधील नेतृत्वगुणांना वाव देण्याऱ्या महाविद्यालयीन निवडणुका सुमारे 1992- 93 पर्यंत सुरू होत्या. मात्र, यामुळे महाविद्यालयांत निर्माण होणारे वाद विकोपाला जात असल्याने या निवडणुका बंद करण्यात आल्या. राज्यशासनाच्या माध्यमातून शिक्षण खात्याशी बोलून विचारविनिमय करून तसेच कायद्याच्या चौकटीत बसवून या निवडणुका सुरू करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
परिषदेचे महामंत्री अनिल ठोंबरे यांच्या शिष्यमंडळाने टिळक यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी टिळक यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या निवेदनात “शासकीय अभियांत्रिकी विद्यालयाला आयआयटीचा दर्जा देण्यात यावा, राष्ट्रीय विधी विद्यालयाची निर्मिती करणे, पुणे विद्यापीठाचा दर्जा सेंट्रल विद्यापीठ करावा, मराठी भाषा उच्च माध्यमिक बोर्डामध्ये अनिवार्य करावे, प्रलंबित असलेला पुणे खंडपीठाचा मार्ग मोकळा करावा, विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण पदविका अभ्यासक्रम सुरू करावा, महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या.
याबाबत सकारात्मक विचार करून शासनदरबारी आपण त्या मांडणार असून यातील जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वास टिळक यांनी या शिष्टमंडळास दिले. या वेळी परिषदेचे अमोल देशपांडे, मयुरेश घुले, शिवराज परदेशी, निखील भोसले, सोहम मोटे, रिया परदेशी यांच्यासह मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश येनपुरे, सरचिटणीस प्रमोद कोंढरे, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.