मुंबई – वाढलेली महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने या अगोदर व्याजदरात तीन टप्प्यात 1.40% ची व्याजदर वाढ केली आहे. आगामी काळात बॅंक मवाळ पत धोरण जाहीर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र सध्या असलेली महागाई उच्च पातळीवर असून ती अस्विकारार्ह आहे असे बॅंकेचे मत आहे. याचा अर्थ आगामी काळातही बॅंक महागाई रोखण्यासाठी आक्रमक व्याजदर वाढ करणार असल्याचे समजले जाऊ लागले आहे.
नुकत्याच झालेल्या बॅंकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीचे इतिवृत्त आता जाहीर झाले आहे. या इतिवृत्तातील माहितीनुसार महागाई रोखण्यासाठी व्याजदरात 0.50% ची वाढ करणे गरजेचे आहे असे बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या बैठकीत स्पष्ट केले होते. समितीच्या इतर सदस्यांनी दास यांच्या या मताला पूर्ण पाठिंबा दिला. आता रिझर्व्ह बॅंकेचा रेपो दर करोणा पूर्व पातळीवर म्हणजे 5.40 टक्क्यावर गेला आहे. आगामी काळातही जर महागाई नियंत्रणात आली नाही तर बॅंक व्याजदरात आणखी वाढ करण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात वाढ केल्यानंतर त्याचा लघु ते मध्यम पल्ल्यातील उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो. मात्र दीर्घपल्यातील जास्त विकासदरासाठी लघू पल्यातील विकासदराचा बळी देण्याची गरज आहे असे मत काही सदस्यांनी यावेळी व्यक्त केले. व्याजदरात वाढ केल्यानंतर महागाई काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र घाऊक किमतीवरील आधारित महागाई अजूनही 15% च्या जवळपास आहे, तर किरकोळ किमतीवरील महागाई अजूनही सात टक्क्यांच्या जवळपास आहे.
दरम्यान अमेरिकेतील महागाई 40 वर्षाच्या उच्चांकावर गेल्यानंतर फेडरल रिझर्व्हने व्याजदरात मोठी वाढ केल्यानंतर आता व्याजदरात जास्त वाढ होणार नाही असे समजले जात असतानाच आणखीही व्याजदरात वाढ करण्याची गरज असल्याचे मत रिझव्हने व्यक्त केल्यानंतर जागतिक बाजारात डॉलर वधारून त्याचा शेअर बाजारावर कालपासून नकारात्मक परिणाम होत आहे. याचा अर्थ भारतीय रिझर्व्ह बॅंकेसह विविध देशातील रिझर्व्ह बॅंकांनी महागाई रोखणे हा एक कलमी कार्यक्रम राबविण्याचे ठरविले असल्याचे दिसून येते.