बारामती (प्रतिनिधी) – अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही. दूधदराचा प्रश्न तसाच आहे. मराठा, धनगर आरक्षणाबाबत महाआघाडी सरकार केवळ आश्वासने देत आहेत. राज्यात अकरावीसह आयटीआय प्रवेशप्रक्रिया ठप्प आहे. दारू दुकाने जोरात सुरू असताना मंदिरे, ज्ञानमंदिरांना टाळे आहेत. अशा मेळ नसलेल्या कृतिशून्य सरकारच्या जनताविरोधी कारभाराविरोधात राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवावा, असे आवाहन पक्षाचे मुख्य महासचिव बाळासाहे दोडतले यांनी केले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा ैठक बारामतीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राज्य प्रभारी माणिकराव दांगडे पाटील, आण्णासाहे रुपनवर, नितीन धायगुडे, संदीप चोपडे, शेखर पाटील, किरण भोसले आदी उपस्थित होते.
दोडतले म्हणाले की, रासपचे संस्थापक महादेव जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष एस.अक्किसागर, प्रदेशाध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या पक्षाच्या विविध भागात आढावा बैठकांचे सत्र सुरू आहे. रासपने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामापूर्वी मदत मिळावी म्हणून राज्यभर धरणे आंदोलन केले. त्याआधी दुधदर वाढवून देण्यासाठी तीन आंदोलने शांततेत केली. मात्र, महाआघाडी सरकार हाताची घडी, तोंडावर बोट असे निष्क्रीय आहे. मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकारची भूमिका तळ्यात मळ्यात राहिलेली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत गांभीर्याने लक्ष न दिल्याने आज मराठा समाजासह सर्वच समाजातील लाखो विद्यांर्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे.
अकरावी, आयटीआय प्रवेश प्रक्रियेसह राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींची अवस्था दयनीय आहे. धनगर समाजासाठी फडणवीस सरकारातील महादेव जानकर यांनी एक हजार कोटींच्या विविध योजनांना मान्यता घेतलेली होती. मात्र, महाआघाडी सरकारने सर्व योजनांना कात्री लाऊन धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. करोना व लॉकडाऊन काळात एकट्या शिक्षण विभागाने परीक्षा, शाळा, प्रवेश प्रक्रिया शिक्षक व विद्यार्थी हजेरी, सुट्या याबाबत शंभरच्या आसपास आदेश काढले आहेत. माणिकराव दांगडे पाटील यांनी प्रास्ताविक केले.