शिर्डी : राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. त्यातच प्रत्येक राजकिय पक्ष राज्यातील जनतेला आश्वासने देत आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2022 पर्यंत राज्यातल्या बेघरांना घरे देणार असल्याचे मोठे आश्वासन दिले आहे. शिर्डीत आयोजित सरपंच आणि उपसरपंचाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
शिर्डीतील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री राम शिंदे, राधाकृष्णविखे पाटील, पंकजा मुंडे, विजय औटी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष पुर्ण होतील त्यावेळी देशातल्या सर्वांना घरे मिळणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. एवढेच नाही तर या वर्षाच्या अखेरपर्यंत 30 हजार किलामिटरचा राज्यातील रस्तादेखील पुर्ण करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.तसेच राज्यातील 3 लाख अतिक्रमणे नियमित केली असून उरलेली आणखी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.