नवी दिल्ली – दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी लावलेले बॅरिकेट्स पोलिसांनी काढायला सुरुवात केली आहे. टिकरी सीमेनंतर आता शुक्रवारी गाझीपूर सीमेवरील बॅरिकेट्सही दिल्ली पोलिसांनी हटवले.
यावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली असून पोलिसांनी आंदोलनाच्या भोवतीचे बॅरिकेट्स हटवल्याने आता संसदेकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मत टिकैत यांनी व्यक्त केले.
गाझीपूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर शेकडो शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. आता दिल्ली पोलीस मजुरांना घेऊन या ठिकाणी दाखल झालेत. हे मजुर आंदोलनाला रोखण्यासाठी रस्त्यांवर लावलेले खिळे आणि बॅरिकेट्स हटवत आहेत. या ठिकाणी आंदोलन करणाऱ्यांमध्ये भारतीय किसान युनियनच्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात अनेक शेतकरी संघटना एकत्र येऊन केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. सरकार जर हटवादीपणा करत असेल तर आम्हीही माघार घेणार नसल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सुरूवातीला चर्चेच्या काही फेऱ्या झाल्यानंतर सरकारने आता शेतकऱ्यांशी केली जाणारी चर्चाही थांबवली असल्यामुळे शेतकरीही इरेला पेटले आहेत. ते माघार घेण्यास नकार देत आहेत. मात्र त्याचवेळी तुम्ही अनिर्बंध काळासाठी रस्ता रोकून धरू शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयानेही शेतकऱ्यांना फटकारले आहे. असे असले तरी शेतकरी आक्रमक भूमिकेत कायम आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आपली पिके कुठेही विकू शकतो असे म्हटले होते. त्याची आठवण करून देत टिकैत म्हणाले आता शेतमाल विकण्यासाठी आम्ही संसदेतच जाणार आहोत. ाम्ही रस्ता अडवलेला नाही. रस्ते अडवणे आमच्या आंदोलनाचा भाग नाही.