नवी दिल्ली – जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत नववर्षाचे स्वागत करणार नसल्याचे सिंघू सीमेवर निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले. सरकारने काल दोन मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, ही बाब आमच्यासाठी नववर्षाचा जल्लोष करण्यासाठी पुरेशी नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
किमान आधारभूत किंमतीला कायदेशीर संरक्षण आणि आणि तीनही कृषी कायदे माघारी घेण्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. ज्या मागण्या मान्य झाल्या आहेत, त्या विधेयकांचे अद्याप कायदे झालेले नाहीत. त्याचा परिणाम अजून समजून यायाचा आहे. त्यामुळे सरकारने स्पष्टपणाने समोर यायला हवे. त्यांच्या सोयीचे काय आहे तेवढेच निवडायचे हे ते ठरवू शकत नाहीत. त्यांना आमच्या सर्व मागण्या ऐकूनच घ्याव्या लागतील, असे पंजाबमधील होशीयारपूरचे शेतकरी हरमेश सिंग यांनी सांगितले.
जर सरकारला आमची ताकद बघायचीच असेल तर आम्ही ती दाखवू. आम्ही वाड्यात राहणारे लोक आता रस्त्यावर झोपत आहोत. आम्ही महिनाभर शांतपणे निदर्शने करत आहोत. आम्ही अशी निदर्शने वर्षभरही करू शकतो, असे होशीयारपूरमधूनच आलेल्या भूपिंदरसिंग या शेतकऱ्याने सांगितले.
बहुतांश शेतकरी नववर्षाचे स्वागत आपल्या कुटुंबापासून दूर राहून करत आहेत, पण त्याबाबत त्यांची काहीही तक्रार नाही. आमचे कटुंब आमच्या घरात आहे. आम्हाला त्यांच्या सहवासाची उणीव नक्कीच जाणवत आहे. पण येथे जमलेलेही आमचे एक कुटुंब आहेत. सर्व शेतकरी आमचे भाऊ आणि काकाच आहेत, असे हरजिंदर या शेतकऱ्याने सांगितले.
जालंधरचे गुरप्रित हायेर आणि भटींडाचे प्रतापसिंग यांनी नववर्षात सेवा करण्याचा संकल्प केला आहे. गुरशिख सेवा सोसायटीबरोबर सर्व शेतकऱ्यांसाठी शुक्रवारी टर्बन लंगर करणार आहेत. तर येथील बांगलासाहीब गुरूद्वारात जाऊन नववर्षात दर्शन घेण्याचा मनोदय प्रतापसिंग यांनी व्यक्त केला. दरवर्षी आम्ही गुरूद्वारात जाऊन दर्शन घेतो. लंगरमध्ये सेवा करतो. यावर्षीही तेच करू, असे प्रताप सिंग यांनी सांगितले.
कृतज्ञता दाखवा
वर्कींग पिपल्स चॅप्टर या संस्थेने नववर्ष किमान पध्दतीने साजरे करून शेतकऱ्यांबाबत कृतज्ञता दाखवावी असे आवाहन केले आहे. हे नवे कायदे केवळ शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत, असे नव्हे तर ते गरीबांविरोधातही आहेत. त्यामुळे बाहेर जाऊन नववर्षाचे स्वागत करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत नववर्षाचे स्वागत करावे. येथे शकोटी पेटवून चांगली भाषणे आणि क्रांतीगीते म्हणत नववर्षाचे स्वागत करू, असे या संस्थेचे निर्मल अग्नी यांनी सांगितले.