मुंबई : स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील कुठलाही भाग वगळला जाणार नसल्याचं अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका स्वराज्यरक्षक संभाजी आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. या मालिकेचे शेवटचे काही भाग दाखविण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केली होती. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे.
मालिकेतील संभाजी महाराजांच्या छळाचा भाग वगळणार, असं कोणतंही आश्वासन मी दिलेले नसल्याचं कोल्हे म्हणालेत. मालिकेत काय दाखवायचं आणि काय नाही हा सर्वस्वी वाहिनीचा निर्णय असतो, असं कोल्हे यांनी स्पष्ट केलंय.
कोणताही शूटिंग केलेला भाग वगळला जाणार नाही. काय दाखवायचे काय नाही हे सर्वस्वी वाहिनीचा निर्णय असतो. कृपया चुकीची बातमी दिली जाऊ नये ही विनंती, असेही ते म्हणाले.
मुळात गेली 2.5 वर्षे मालिका सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे. परंतू मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय वाहिनीचा असेल असे त्यांनी सांगितले.
दरम्यान स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत अखेरीस दाखवण्यात येणारा संभाजी महाराजांच्या हत्येचा भाग वगळला जाणार असल्याचं अश्वासन अमोल कोल्हे यांनी फोनवरुन दिलं. असी माहिती अर्जुन खोतकरांनी दिली होती. मालिकेच्या शेवटी संभाजी महाराजांचा मृत्यू दाखवू नका अशी खोतकरांची मागणी होती. मात्र अखेर अमोल कोल्हे यांनी स्वत: याबाबत स्पष्टीकरण दिलं.