नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात जितिन प्रसाद यांनी जे केले ते प्रसादाराम राजकारण आहे. तत्वांशी केली जाणारी अशी तडजोड पाहून लोकांचा राजकारणावरचा विश्वासच उडून जाईल असे भाष्य कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी केले आहे. आपण जीवंत असेपर्यंत तरी भाजपमध्ये जाणार नाही हेही त्यांनी यावेळी सांगून टाकले.
सिब्बल हे कॉंग्रेसमधील जी-23 गटाचे सदस्य आहेत. हा तोच गट आहे, ज्याने गेल्या वर्षी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून खळबळ उडवून दिली होती. पक्षात तातडीने डागडुजी करण्याची गरज असल्याचे या गटातील दिग्गज नेत्यांनी सोनियांना जाहीरपणे कळवले होते. तेव्हापासून ही सगळी नेतेमंडळी काही काळ अडगळीत गेल्यासारखी वाटत होती. मात्र कॉंग्रेसने यातील काहींचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
जितिन यांच्याबाबत बोलताना सिब्बल म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने काय केले अन काय केले नाही हे आपण बोलणार नाही. मात्र हा जो निर्णय त्यांनी (जितिन) घेतला आहे तो निर्णय विचारधारेवर आधारित नाही. आज आपण राजकारणात त्या टप्प्यावर आलो आहोत, जेथे प्रसादाराम राजकारण सुरू झाले आहे. अगोदर आयाराम गयाराम होते.
आता हा प्रकार आहे. प. बंगालमध्येही असेच काही घडल्याचे आपण पाहिले. भारतीय जनता पार्टी विजयी होणार असल्याचे वाटणाऱ्यांनी अचानक पक्ष बदलले. तुम्ही विचारधारेवर आधारित निवडणूक लढवू इच्छित नसतात. तर मला स्वत:ला काय मिळणार आहे याचा विचार करून निर्णय घेत असतात. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकातही असाच प्रकार झाला.
दरम्यान, कॉंग्रेसमध्ये सुधारणांची आवश्यकता असून नेतृत्वाला ते ऐकावे लागेल असेही त्यांनी जाता जाता सुनावले आहे.