लखनौ – सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ काफिल खान यांची नुकतीच अलाहबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मथुरा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. हायकोर्टाने त्यांच्यावर रासुका खाली करण्यात आलेली कारवाई रद्दबातल ठरवली आहे. कारागृहातून सुटल्यानंतर ते कॉंग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी अपेक्षा होती, पण त्यांनी आपण राजकारणात न जाता डॉक्टरी पेशाचेच काम करीत राहु असे म्हटले आहे.
त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की सरकारने आपल्याला अलिगड मुस्लिम विद्यापीठातील भाषणाच्या कारणावरून कारागृहात टाकले. परंतु आपले तेथील भाषण द्वेष किंवा हिंसाचार पसरवणारे नव्हते तर आपण राष्ट्रीय एकात्मतेचाच तेथे पुरस्कार केला होता. आपण डॉक्टर आहोत आणि डॉक्टरीच करणार आहोत राजकारणात जाण्याचा आपला इरादा नाही असेही त्यांनी नमूद केले.
बिहार मधील पूरग्रस्त भागाला भेट देऊन तेथील पूरग्रस्तांना आपण मदत करू इच्छितो असेही त्यांनी सांगितले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या सुटकेचे आदेश 1 सप्टेंबर रोजी दिले होते परंतु तरीही आपल्या सुटकेला विलंब झाल्याने आपल्याला पुन्हा दुसऱ्या कोणत्या तरी गुन्ह्यात अडकवले जाईल की काय अशी भिती निर्माण झाली होती असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.
या प्रकरणात कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आपल्याला मदत केल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉ काफिल खान हे सध्या राजस्थानात वास्तव्याला गेले असून त्यांना तेथे पोलिस सुरक्षाही प्रदान करण्यात आली आहे. त्यासाठीही त्यांनी प्रियांका गांधी यांचे आभार मानले आहेत.