कोलकाता – भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगाल मध्ये सत्तेवर आला तर एनआरसी लागू करेल आणि नागरीकांचे नागरिकत्व काढून घेईल असा प्रचार विरोधी पक्षांकडून पश्चिम बंगाल मध्ये सुरू आहे. तो चुकीचा असून आम्ही पश्चिम बंगाल मध्ये एनआरसी म्हणजेच नागरीकत्वाचे नॅशनल रजिस्टर तयार करणार नाही असे स्पष्टीकरण भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी दिले आहे.
ते म्हणाले की आम्ही एनआरसी लागू करणार नाही पण सीएए लागू करणार आहोत. शेजारच्या देशात धार्मिक कारणासाठी ज्या अल्पसंख्याकांना छळले जात आहे त्यांना भारतात नागरीकत्व दिले पाहिजे आणि तो त्यांना आम्ही प्रदान करणार आहोत. सीएए कायद्याचा देशातील दीड कोटी नागरीकांना लाभ होणार असून त्यातील 72 लाख पश्चिम बंगाल मधील आहेत. या संबंधात विरोधी पक्षाचे लोक बदनामाची मोहीम राबवत आहेत असा आरोपही विजयवर्गीय यांनी केला.