पटना – बिहारमध्ये यंदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले असले तरी राज्यात मोठे राजकीय उलटफेर झालेत. बिहारच्या जनतेने बहुमताचा आकडा जरी भाजप व नितीश कुमारांच्या जेडीयूच्या पारड्यात टाकला असला तरी येथे संख्याबळाच्या बाबतीत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राजद सर्वात मोठा पक्ष ठरलाय.
काठावरचे बहुमत असल्याने व यंदा जेडीयू-भाजप आघाडीत भाजप मोठा भाऊ ठरल्याने येथील पडद्यामागील राजकीय घडामोडी अद्यापही सुरूच आहेत. अशातच आज राजद नेते श्याम रजक यांनी जेडीयूचे १७ आमदार लवकरच राष्ट्रीय जनता दलात प्रवेश करणार असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत बोलताना रजक यांनी, “जदयूचे आमदार भाजपाच्या कार्यशैलीमुळे नाराज आहे. त्यामुळे बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार पाय उतार करण्याच्या तयारीत आहेत. भाजपामुळे नाराज असल्यानेच हे १७ आमदार राजदमध्ये येण्यास इच्छुक आहेत. पण त्यांना तुर्तास त्यांना थांबण्यात आलं आहे,” असं वक्तव्य केलंय.
तत्पूर्वी, भाजपने काही दिवसांपूर्वी एनडीएतील घटक पक्ष असलेल्या आणि बिहारमध्ये सत्तेत असलेल्या जेडीयूचे सहा आमदार फोडले होते. त्यामुळे जेडीयूमधून नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. नितीश कुमार यांनीही ही नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळेच १७ आमदार नाराज असल्याचा दावा रजक यांनी केला आहे.
म्हणून आमदारांचा प्रवेश थांबवला…
आमदारांच्या प्रवेशाबाबत बोलताना रजक यांनी, “जदयूचे हे १७ आमदार राजदमध्ये येण्यास तयार आहेत. त्यांना आताच पक्षात घेतले, तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचं सदस्यत्व रद्द होऊन आमदारकी धोक्यात येऊ शकते. पक्षांतर कायद्याप्रमाणे २५ ते २६ आमदार एकाच वेळी जदयूतून बाहेर पडून राजदमध्ये आले, तर त्यांचं सदस्यत्व कायम राहिल,” असं स्पष्टीकरण दिलं.