संगमनेर – लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हणतात रोजगार द्या, आमच्या शेतीमालाल योग्य भाव द्या, कांद्याचे भाव कमी करा. मोदी हे काय कांदे उगवणार आहेत का, असा सवाल योगगुरू स्वामी रामदेव बाबा यांनी संगमनेर येथील गीता महोत्सवामध्ये बोलताना केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गीता परिवाराचे संस्थापक स्वामी गोविंददेवगिरीजी यांचीही व्यासपीठावर यावेळी उपस्थिती होती.
कांदा टंचाई निर्माण झाल्यामुळे कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. देशात सध्याची कांद्याची परिस्थिती पाहता, परदेशातून कांदा आयातीबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. त्यातच संगमनेर येथे गीता जयंतीनिमित्ताने गीता परिवाराने आयोजित केलेल्या गीता महोत्सवामध्ये योगगुरू स्वामी रामदेव बाबा यांनी कांद्याच्या वाढणाऱ्या दरासह बोरोजगारी बाबत भाष्य केले.
आजकाल लोक पंतप्रधान मोदींना कोसत आहेत. मोदीजी रोजगार द्या, आमच्या शेतीमालाला योग्य बाजार भाव द्या, मोदीजी महागाई कमी करा, अशी मागणी करत आहेत. लोक मोदी यांना म्हणतात कांद्याचे भाव कमी करा. मोदी हे काय कांदे उगवणार आहेत का, असा सवाल उपस्थित करतानाच काही लोक मोदी यांना उगाच कोसत आहेत. आपण मोदींना कोसण्यात काही उपयोग नसल्याचे ते म्हणाले.