मुंबई – एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या मातोश्रीचे निधन झाले म्हणून राष्ट्रवादीचे राजेश टोपे तिकडे गेले असतील. अशावेळी राजकीय चर्चा करायची नसते. टोपे यांनी ती केली नसेल याची खात्री आहे. या चर्चेबाबत काही विधान करण्याची गरज नाही. निधन झालेले असताना जाणे आणि राजकीय चर्चा करणे ही आमची संस्कृती नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आघाडीचा प्रस्ताव दिला. त्यामुळे राज्यात एकच राजकीय धुळवड सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी आज संवाद साधला.
पाटील म्हणाले की, एमआयएम समविचारी पक्ष आहे का याचा अभ्यास करावा लागेल. एमआयएम समविचारी आहे असे म्हणायचे असेल तर त्यांनी भाजपला असलेला त्यांचा विरोध कृतीत दाखवला पाहिजे. उत्तर प्रदेशात सपाचा पराभव झाला. 86 मतदारसंघात दोन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. तिथे एमआयएमने पाच हजार मते घेतली.
एमआयएममुळे हा पराभव झाला आहे. त्यांनी भाजपला मदत केली हेच स्पष्ट होत आहे. भाजप वेगवेगळ्या समाजाला उभे करून मते फोडण्याची खेळी करत असतो. त्यामुळे विरोधी पक्षांच्या समविचारी मतात फूट पडते. त्याचा विरोधी पक्षाला फटका बसतो. म्हणूनच भाजपच्या पराभवात एमआयएमला रस असेल तर त्यांनी कृती दाखवली पाहिजे, असे आव्हानच जयंत पाटील यांनी दिले आहे.