मांगडेवाडी उपनगर वार्तापत्र : धिरेंद्र गायकवाड
जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायतराज मधील महत्त्वाचा दुवा शिवाय सरपंच, ग्रामपंचायत सदस्य असा प्रशासकीय लवाजमा असताना केवळ शहरानजीक असल्याने मांगडेवाडी पूर्णत: दुर्लक्ष राहिली. आता, महापालिकेत समावेशाबाबतही वैचारिक मतभेद असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे गाव समाविष्ट करून घ्या म्हणणारा गट तर दुसरीकडे गाव महानगरपालिकेमध्ये समाविष्ट न करता गावठाण म्हणून दर्जा द्या, अशी मागणी करणारा गटही आहे. तर, गावात किमान मूलभूत सुविधा तरी द्या, अशी माफक अपेक्षा सामान्य नागरिक ठेवून आहे.
पुणे-बंगळूर महामार्गालगत सुमारे चार हजार लोकसंख्या असलेले एक महत्त्वाचे गाव मांगडेवाडी. येथे ग्रामपंचायतीची स्थापना 2002 मध्ये झाली. सदस्य संख्या 12 असून सरपंच, उपसरपंच पदी महिला विराजमान आहेत. आता, पुणे महानगरपालिकेच्या एकूण 34 गावे समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये 2017 पासून 11 गावे समाविष्ट केली गेली, त्यानंतर या वर्षी 23 गावे मार्चपर्यंत समाविष्ट करण्यात येत आहेत. यामध्ये मांगडेवाडीचाही समोवश आहे. परंतु, पालिका समावेशानंतर तरी गावातील मूलभूत प्रश्न सुटतील का? याबाबत नागरिकांच्या मनात शंका आहे.
समाविष्ट गावातील प्रश्नच अद्याप रेंगाळलेले असताना मांगडेवाडी सारखे गाव पालिकेत का आणि कशासाठी समाविष्ट करण्यात येत आहे? असाही प्रश्न नागरिकांना पडत आहे. तर, पालिकेत गाव गेल्याने विकास होईल, अशी अपेक्षा बाळगारा गटही गावात आहे. यातूनच या गावात पालिका समावेशाच्या मुद्यावरून मतभेद दिसून येतात.
कात्रज परिसरालगत असलेल्या मांगडेवाडीत पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. याबाबत
प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही पाण्याची समस्या सुटत नसल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत. त्यातही कचरा प्रश्नाची भर पडलेली आहे. सद्यस्थितीत गावांतील ओढ्यामध्ये तसेच महामार्गालगत कचरा टाकण्यात येतो. कात्रज घाटामध्ये देखील मोठ्या संख्येने कचरा टाकण्यात येत असल्याने या परिसरामध्ये दुर्गंधी सुटत आहे. कचऱ्यामुळे परिसरात सर्वत्र अस्वच्छता दिसून येते.
मांगडेवाडीत असलेल्या जुन्या विहिरीतूनच सध्या पिण्याचे पाणी पुरविले जाते. ही विहीर कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावा शेजारी आहे. सुरवातीच्या काळात या विहिरीच्या पाण्यातून वाडीची गरज भागत होती. परंतु, या परिसराची सध्याची लोकसंख्या 10 ते 20 हजाराच्या आसपास असल्याने पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला आहे. गाव विस्तारल्याने आठवड्यातून दोन ते तीन वेळाच पाणी येत आहे. या गावांमध्ये बारा महिने पाण्याचे टॅंकर धावत असतात. यामुळे पाण्याच्या पैशातून येथे होणारी उलाढाल मोठी आहे.
उन्हाळ्यांतील दिवसांत विहिरीचे पाणी कमी झाले की संपूर्ण मांगडेवाडीला पिण्यासाठी विकतचेच पाणी घ्यावे लागते. सुमारे 213.61 हेक्टर क्षेत्रात विस्तारलेली मांगडेवाडी डोंगर उतारावर असल्याने ओढ्यालगत इमारतींची संख्या अधिक आहे. या परिसरात अतिक्रमणाची समस्याही मोठी आहे. संपूर्ण वाडीला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने टॅंकरमुळे परिसरातील सर्वच रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे.
…सुरू असलेले काम बंद
मांगडेवाडी गावात इतर जिल्ह्यांतून आलेल्या नागरिकांचे प्रमाण मोठे असून नागरिकरण वाढते आहे. यातून ग्रामपंचायत प्रशासनावर ताण येत आहे. येथील ओढ्यातून सांडपाणी निचरा करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आलेली 10 कोटींची ड्रेनेजलाइनची काम सुरू अर्धवट स्थितीत बंद आहेत. त्यामुळे पालिकेत गाव समोवशानंतरही अशीच स्थिती राहणार का? असाही मतप्रवाह आहे. तर, या ठिकाणच्या भूमिपुत्रांच्या जागा बीडीपी झोनमध्ये न टाकता निवासी झोन करण्यात यावा. यामुळे येथील भूमिपुत्रांना रोजगार निर्मिती होईल, अशीही एक मागणी पुढे येत आहे.