कोल्हापूर (प्रतिनिधी) – करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती बदलून दुसरी बसवणार असल्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत. सध्याची मूर्ती भग्न झाल्याने देवस्थान समितीकडून हालचली सुरू झाल्याची माहिती समोर आलीय.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे महेश जाधव यांनी नव्या मूर्तीची पाहणी केल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
कोल्हापूरच अंबाबाई मंदिर. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्वाचे पीठ म्हणून या देवस्थानची देशभर नव्हे तर जगभर ओळख आहे. अंबाबाईला करवीर निवासिनी अस देखील म्हटलं जातं. अंबाबाई च्या दर्शनासाठी देशभरातून नाही तर जगभरातून लाखो भाविक दरवर्षी कोल्हापूरला येतात. तसेच परदेशी भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
कोल्हापूरच अंबाबाई मंदिर हजारो वर्षे जुन असून मूर्ती देखील हजार वर्षे जुनी आहे. या मूर्तीवर अभिषेक करून मूर्तीची झीज झाली आहे. तसेच 2015-2016मध्ये मूर्तीवर वज्र लेप करण्या आला होता. यानंतर मूर्तीवरील अभिषेक प्रक्रिया बंद झाली आहे. तसेच मूर्तीचे काही भाग भंगलेल्या अवस्थेत आहेत, अशा मूर्तीच पूजन व्हावं की न व्हावं याबाबद्दल मतमतांतरे आहेत.
यासंदर्भात यापूर्वी देवस्थान समितीला मूर्तीबद्दल पत्र प्राप्त झाले आहेत. त्यानुसार देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आज मूर्तिकार अशोक सुतार यांनी घडवलेल्या नव्या मूर्तीची पाहणी केली. पुरातत्व विभागाकडून सध्याची मूर्तीच्या स्थितीची पाहणी करून देवस्थान समिती निर्णय घेणार असल्याचे अध्यक्षांनी म्हटले आहे.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील अंबाबाईची मूर्ती हे जरी जुनी असली, तरीदेखील सध्या या मूर्तीवरती कोणताही अभिषेक करण्यात येत नाही. तसेच मूर्ती अनेक ठिकाणी भग्न असल्याने या मूर्तीची पूजा करताना देखील पुजाऱ्यांना कसरत करावी लागते. कोणी राजकीय हेतूने ही मूर्ती बदलण्याचा निर्णय घेणार असेल तर त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडणे गरजेचे आहे. अन्यथा कोल्हापुरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा आंबाबाई भक्तांनी दिला आहे.