नवी दिल्ली- निदर्शक शेतकरी नरेंद्र मोदी यांच्या प्रतिष्ठेचा सन्मान करतात. मात्र, मात्र ते स्वत:च्या आत्मसन्मानाचे रक्षण करण्यास तेवढेच बांधील आहेत, अशी भावना भारत किसान युनियनचे प्रमुख नरेश टिकैत यांनी रविवारी व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करण्याबाबत सरकार एका फोन कॉलच्या अंतरावर आहे असे शनिवारी सांगितले होते. तर रविवारी मन की बातमध्ये बोलताना प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अपमान झाल्याने धक्का बसल्याचे म्हणाले होते.
या पार्श्वभूमीवर टिकैत म्हणाले, सरकारने आधी आमच्या माणसांची सुटका करावी आणि चर्चेसाठी सकारात्मक वातावरण तयार करावे. त्यातून एक सन्मानजनक तोडगा काढला जावा. एखादा मध्यम मार्ग शोधला जावा, असे टिकैत म्हणाले.
आम्ही दबावाखाली काहीही मान्य करणार नाही. आम्ही पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा सन्मान आणि आदर करतो. सरकार किंवा संसदेने गुढघे टेकवावेत, अशी शेतकऱ्यांची कधीही इच्छा नव्हती आणि नाही. त्याचवेळी आम्ही शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाचेही रक्षण करू. त्यासाठी मध्यम मार्ग निघाला पाहिजे. चर्चा त्यासाठी व्हायला हवी, असे त्यांनी सांगितले.
आम्ही कोणत्याही दबावाखाली कोणताही करार करणार नाही. या मुद्द्यावर आम्ही चर्चा करू. पंतप्रधान आमचेही आहेत. त्यांच्या पुढाकाराबद्दल आम्ही आभार मानतो. आम्ही त्याचा आदर करतो. आम्हाला आमची माणसे सोडायला हवी आहेत.
26 जानेवारीच्या हिंसाचाराबद्दल ते म्हणाले, 26जानेवारीचा हिंसाचार हा एक कट होता. तिरंगा हा सर्वापेक्षा आणि सर्वात उच्च स्थानी आहे. आम्ही त्याचा अपमान कोणालाही करू देणार नाही. हे आम्ही सहन करणार नाही.
टिकैत यांची लोकप्रियता वाढली
उत्तर प्रदेशमध्ये निदर्शन स्थळांवर आजू बाजूच्या परिसरातून आलेल्या शेतकऱ्यांमुळे आणखी काही तंबू लागले. टिकैत यंच्याशी दोन शब्द बोलायला मिळावेत किंवा सेल्फी काढायला मिळावी म्हणून अनेक जण तासन् तास बसून असतात. अन्य शेतकरी नेते चर्चेत व्यस्त असतात.
टिकैत बोलायला लागतात त्यावेळी सर्व जण शांत होतात. गेल्या काही दिवसांत त्यांना केवळ दोन-तीन तास झोप मिळत आहे. त्यातच त्यांचा रक्तदाबही वाढला होता. मात्र आता सारे ठिक आहे, असे टिकैत यांच्या एका विश्वासू शहकाऱ्याने सांगितले.