नेमबाज अपूर्वी चंडेलाचा विश्वास
नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला पदक जिंकून देणार, असा विश्वास भारताची अव्वल नेमबाज अपूर्वी चंडेला हिने व्यक्त केला आहे. 2004 सालच्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत राजवर्धन राठोड याने नेमबाजीत देशाला पदक जिंकून दिले होते. त्यानंतर खरेतर देशात क्रीडा संस्कृती रुजण्यास मदत झाली. त्यांच्या कामगिरीतूनच माझ्यासारख्या अनेक नेमबाजांनी प्रेरण घेतली व या खेळात देशाला आणखी पदके जिंकून देण्यासाठी कठोर मेहनत घेण्यास सुरुवात केली, असेही अपूर्वीने सांगितले.
आता करोनाच्या धोक्यामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षाने पुढे गेल्याने सुरुवातीला निराश झाले होते. जबरदस्तीने का होईना पण हा मिळालेला वेळ सत्कारणी लावता येतो याचे जास्त समाधान आहे. गेल्या मोसमापासून सातत्याने स्पर्धा खेळल्याने विश्रांतीच मिळाली नव्हती. करोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले व खेळाडूंनाच सरावही करता येत नव्हता. त्यामुळे खूप निराशाजनक वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सरकारने देशातील क्रीडा संकुले व मैदाने खुली करण्याची परवानगी दिली व खेळाडूंना सराव करणे शक्य झाले. आता मनस्थिती पूर्णपणे सकारात्मक असून कसून सराव सुरू केला आहे, असेही तिने स्पष्ट केले.
विश्वकरंडक, आशियाई तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये महिला गटात 10 मीटर एअर रायफल प्रकारात अपूर्वीने सातत्याने पदके मिळविली आहेत. आतापर्यंत 10 आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई करणारी अपूर्वी येत्या काळात ऑलिम्पिकपूर्व स्पर्धांमध्येही सहभागी होणार आहे. तिच्या नावावर जागतिक व आशियाई पदक जमा झाले त्यावेळी तिची नवी ओळख निर्माण झाली. गेल्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले त्यानंतर झालेल्या आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेत तिने ऑलिम्पिक पात्रता पटकावली. गेल्या तीन मोसमात भारतीय नेमबाजांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा प्रस्थापित केला असून या खेळात महिला खेळाडूंनीही आपली छाप पाडली आहे.
मेहनतीला पर्याय नाही…
देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न होते, ते पूर्ण झाले. कोणत्याही खेळात खेळाडूला मेहनत करण्याशिवाय अन्य कोणताच पर्याय नसतो. जिद्द, इच्छाशक्ती, कठीण प्रसंगातही मनाचा खंबीरपणा याच गोष्टी एका सामान्य खेळाडूला विजेता बनण्यासाठी महत्त्वाच्या असतात. देशाकडून खेळण्याचे भाग्य मला लाभले याचा सर्वात जास्त आनंद होतो. टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक जिंकून देण्यात यश आले तर तो क्षण आयुष्यातील सर्वाधिक समाधानाचा व आनंदाचा असेल, असेही अपूर्वीने सांगितले.