कुरूक्षेत्र -शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलनजीवी या शब्दप्रयोगावरून प्रत्युत्तर दिले. देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या महान क्रांतिकारकांनाही परजीवी मानणार का, असा सवाल टिकैत यांनी केला.
राज्यसभेत सोमवारी बोलताना मोदी यांनी शेतकरी आंदोलनामागे असणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. आंदोलनाशिवाय राहू न शकणाऱ्या आंदोलनजीवी लोकांचा नवा वर्ग देशात उदयाला आला आहे, अशी टिप्पणी मोदी यांनी केली. त्याचा संदर्भ घेऊन टिकैत यांनी हरियाणातील शेतकरी महापंचायतीत भूमिका मांडली. त्यावेळी त्यांनी मोदींचा नामोल्लेख आणि आंदोलनजीवी शब्दाचा उल्लेख टाळला.
आंदोलनकाळात सुमारे 150 शेतकऱ्यांनी जीव गमावला. त्यांनाही परजीवी म्हणणार का? आंदोलनात सहभागी होऊन प्राण गमावण्यासाठी ते दिल्लीला गेले होते का, अशा प्रश्नांची सरबत्ती टिकैत यांनी केली.