नवी दिल्ली – स्मृती इराणी यांच्या कार्यकाळात मध्ये वस्त्रोद्योग विस्तारीकरणासाठी महत्त्वपूर्ण उपाय योजना करण्यात आल्या आहेत. या योजना आगामी काळात वाढविण्यात येतील आणि हे क्षेत्र अधिक उत्पादक बनेल याची काळजी घेण्यात येईल असे वस्त्रोद्योगमंत्री पियुष गोयल यांनी या मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले.
गोयल म्हणाले की, भारतामध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्याचे ब्रॅंडिंग झालेले नाही. आपण या क्षेत्रात उत्पादनांचे ब्रॅंडिंग वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसे झाले तर वस्त्र उद्योग क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ शकणार आहे.
चीनमधील घडामोडीनंतर या क्षेत्रातील चीनचा वाटा कमी झाला आहे. हा वाटा मिळविण्यासाठी भारत आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षेत्रात रोजगाराच्या जास्त प्रमाणात संधी आहेत. त्यातल्या त्यात महिलांसाठी रोजगाराच्या संधी अधिक आहेत.
त्यामुळे हे क्षेत्र वाढले तर रोजगार वाढू शकतो. सध्याचे सरकार रोजगार वाढविण्यावर भर देत असल्याचे ते म्हणाले. मेक इन इंडिया अंतर्गत या क्षेत्रामध्ये अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.