कोरेगाव -करोना काळात अनेक व्यवसायांवर अनिष्ट परिणाम झाला. त्यापैकी दूध व्यवसायावर त्याचा गंभीर परिणाम झाला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा मुख्य जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जात आहे. पण सध्या दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. दूध उत्पादकांची दिवाळी गोड होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दीड वर्षापासून करोनाने थैमान घातले आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढत आहेत. त्यात मिठाईच्या किमतीही गणेशोत्सव, नवरात्रीपासून वाढल्या आहेत. गणेशोत्सवासह नवरात्रीत मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यानंतर दसऱ्याला बासुंदी, पेढे, मावा सर्वाधिक मागणी होत असल्याने मोठी उलाढाल झाली; पण याचा फायदा दूध उत्पादक शेतकरी झाला नाही.
मागील काही दिवसात साखर, दूध, डाळी, सिलिंडर गॅस, खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने मिठाईच्या दरात वाढ झाली तरी सणासुदीत गोडवा कमी झाला नाही. मिठाईच्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसल्याचे चित्र आहे. मिठाईसाठी साखर, बेसन पीठ, मैदा व इतर पदार्थांचा दर वाढल्याने मिठाईचे व दुग्धजन्य पदार्थांचे दर वाढले असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
गणेशोत्सवात मोदक, पेढा, मोतीचूर लाडू, बेसन लाडू या मिठाईला ग्राहक पसंती मिळाली होती. मोठी उलाढाल मिठाई बाजारात झाली होती. एकीकडे मिठाईचे भाव वाढलेले असताना दुधाचे दर वाढलेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
मिठाई व दुग्धजन्य पदार्थांसाठी अत्यावश्यक असणारा महत्वपूर्ण घटक म्हणजे दूध पण याच दुधाला भाव मिळत नाही. वाढेलेले पशू खाद्य, चाऱ्याचे भाव, पेट्रोल, डिझेलचे वाढलेले भाव यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. येणारी दिवाळी तरी गोड होईल का, या आशेवर दूध उत्पादक शेतकरी डोळे लावून आहेत.
चारा, पशुखाद्य यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून दुधाचे दर मात्र कमी झाले आहेत. त्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला चांगला दर देण्यातही शासनाने प्रयत्न करायला हवा.
-शशिकांत फडतरे, दूध उत्पादक शेतकरी कोरेगाव भीमा