नगर -नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हेगारीचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यापाठोपाठ नगर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. त्यामुळे नगर जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी संघटीत गुन्हेगारांचे रॅकेट उद्ध्वस्त करणार असून, त्यासाठी विविध पथके तयार करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार आहोत. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना केल्या आहेत, असे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी सांगितले.
डॉ. दिघावकर यांनी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नगरला येवून पहिल्यांदाच आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मजोज पाटील उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
दिघावकर म्हणाले, नगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्ह्या आहे. तसेच राजकीय दृष्ट्याही मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. त्यामुळे कायदा सुवेस्थेची मोठी जबाबदारी आहे. त्यानुसार जिल्ह्यातील संघटीत टोळ्या गुन्हेगार, खुन, लुटमार, दरोडे, फसवणूकीच्या घटनांना आळा घातला जाणार आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षकांन सुचना करण्यात आल्या आहेत.
तसेच वर्षभर मेहनत घेऊन कष्टाने पिकविलेली पिके शेतकरी विश्वासाने अन्य राज्यांतील व्यापाऱ्यांकडे सुपूर्द करतात. व्यापारी शेतकऱ्यांना धनादेश देतात. हा धनादेश बॅंकेत वठला नाही की फसवणूक झाल्याचे लक्षात येते. असे प्रकार नाशिक मध्ये जास्त आहेत. नगरमध्ये असे घडले तर त्यांची गय केली जाणार नाही. असे आदेश परिक्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशन्सच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच रस्ते आणि महामार्गांवरील गुन्हेगारी, अवैध दारू व गुटख्यांची वाहतूक व ग्रामीण भागात घडणारे विविध प्रकारचे गुन्हे, महिलांविषयक गुन्हे रोखण्यास आमचे प्राधान्य असेल असे ही दिघावकर यांनी म्हटले.