मुंबई – आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला आहे. मागील २० दिवसांपासून या प्रकरणावरून वाद सुरू आहे. राठोड यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला. भाजपने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती.
पुण्यात पीडित मुलींच नाव सरकार आणि विरोधकांकडून सर्रास वापरण्यात येत आहे. वास्तविक पाहता अशा प्रकरणांमध्ये पीडितेचं नाव वापरलं जात नाही. मात्र पीडितेच्या हत्या प्रकरणात नाव वापरण्याहून कोणीही सावधानता बाळगली नाही. पीडितेचं नाव वापरणाऱ्यांविषयी आणि त्यांच्या कुटुंबाविषयी बोलणाऱ्यांवर कारवाईसाठी विचार करू, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पीडितेच्या आई-वडिलांनी स्वतः पत्र लिहून महाराष्ट्र सरकारवर विश्वास दाखवला आहे. त्यांनी तपास करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय. मात्र त्याचवेळी कुटुंबाची बदनामी झाल्याचं तिच्या आई-वडिलांनी म्हटल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
न्यायाने वागणं ही आमची जबाबदारी आहे. दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच या सरकारची भूमिका आहे. मात्र, सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे म्हणून काम केलं जातंय. आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे असं म्हटलं जातंय. मात्र, तसा तपास होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.