नारायण राणे : जिल्ह्यातील तीनही जागा भाजपच्या असतील
सावंतवाडी : निवडणूक होऊ दे त्यानंतर मातोश्री समोर येऊन तोंडं कायमची बंद करेन, असा इशारा भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. राणे गप्प बसतील असे कोणाला वाटत असेल तर तसे होणार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात जिल्ह्यातील तीनही जागा भाजपच्या असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी येथील प्रचारसभेत राणे बोलत होते. राणे म्हणाले, मी असा-तसा होतो, तर मला मुख्यमंत्री का बनवले? शाखाप्रमुख, बेस्ट चेअरमन, मंत्री, आमदार, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता ही पदे का दिली?, असा सवालही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना केला.
दीपक केसरकर यांना विकासाची दिशा माहिती आहे का? असा सवाल करत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. या जिल्ह्याचा पालकमंत्री मंत्रिमंडळात चेष्टा आणि मस्करीचा विषय बनला आहे. मंत्रिमंडळातील जोकर म्हणजे दीपक केसरकर, अशा परखड शब्दांत नारायण राणे यांनी केसरकरांवर टीका केली आहे. पर्यटनात गोवा सिंधुदुर्गपेक्षा जास्त पुढे असल्याने गोव्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करणार आहे. कोकणाच्या विकासासाठी उध्दव ठाकरे यांनी काय केले? त्यांचे योगदान काय? शिवसेनेच्या नेत्यांनी काय केले? यासारखे सवाल राणे यांनी उपस्थित केले.
शिवसेनेच्या जन्मापासून वाढताना पाहिलेला नारायण राणे आहे. कोकणाला आत्तापर्यंत सेनेने काही दिल नाही, मीच सरकारशी भांडून योजना आणल्या. सी-वर्ल्ड प्रकल्प सिंधुदुर्गमध्ये, मालवणमध्ये मी आणला. येत्या दोन वर्षात आम्ही सी-वर्ल्ड प्रकल्प करु असं मुख्यमंत्री बोलले आहेत. दीपक केसरकरांनी खोट बोलून मंत्रीपद घेतले. तसेचे मला न घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना फोन करून छळल, असा आरोपही राणेंनी केला.