डॉ. बाबा आढाव यांचा सवाल
पंतप्रधानांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे “माफी आंदोलन’
पुुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनाही “आंदोलनजीवी’ म्हणणार का? असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलन करणाऱ्यांची आंदोलनजीवी म्हणत हेटाळणी केली होती. त्यामुळे डॉ. बाबा आढाव आणि त्यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा अपमान झाला आहे. याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे माफी आंदोलन करण्यात आले. प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रदीप देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुरुवारी डॉ. बाबा आढाव यांची भेट घेतली.
क्षुद्र राजकारणासाठी देशाच्या पंतप्रधानांनी चळवळीतील आपल्यासारख्या अनेक ज्येष्ठांचा अपमान केला आहे. आंदोलनाची महती त्यांना माहित नाही. आपल्यासारख्या अनेक ज्येष्ठांनी उभालेल्या चळवळींमुळेच देश येथपर्यंत पोहोचू शकला.
आंदोलनातून समाजाची जडणघडण होत असते. नवा, समृद्ध समाज निर्माण होत असतो, हे यांना माहित नाही. त्यामुळे त्यांना माफ करा, अशी विनंती बाबांना करत हे माफी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची महती पंतप्रधानांना समजावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते पत्रही पाठवित आहेत.