जयकुमार गोरे : स्वार्थी टोळक्यांना जनता भीक घालणार नाही
सातारा – ठरलंय वाल्यांचे काहीही आणि कसेही ठरु द्या, त्यांनी कितीही तयारी करु द्या, जयकुमार पहिल्यांदा चार हजाराने, दुसऱ्यांदा चोवीस हजाराने आणि आता 51 हजार मतांनी निवडून येणार आहे. ठरलंयवाल्यांचा कुणाचा आणि किती आकड्यात सौदा झालायं हे मला माहीत आहे. स्वार्थी टोळक्याच्या विषवल्लीला माण-खटावची स्वाभिमानी जनता भीक घालणार नाही असा विश्वास जयकुमार गोरेंनी व्यक्त केला.
खटाव तालुका भाजप कार्यालयात भाजपा महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. पेठे, तालुकाध्यक्ष विकल्प शहा, बाळासाहेब मासाळ, प्रदीप शेटे, जयवंत पाटील, अजय शेटे, अनिल माळी, किशोरीताई पाटील, वचनशेठ शहा, कंतामामा खुस्पे, अशोक काळे, रवी पेठे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, मतदारसंघात भाजपची पायाभरणी करणारे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. आता विरोधकांचा चक्रव्यूह भेदण्यात आपल्याला निश्चित यश येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी माझा पाण्याचा आणि विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्याचा संघर्ष जवळून पाहिला आहे. दुष्काळमुक्तीचा एकमेव अजेंडा घेऊन मी गेली दहा वर्षे लढतो आहे. सात वर्षांपासून मतदारसंघात पाणी आणण्यात मला यश आले आहे. पाणी देताना कधीच दुजाभाव न करता रोटेशनप्रमाणे प्रथम खटाव आणि नंतर माण तालुक्याला पाणी दिले आहे.
जिहेकठापूर योजनेचे पाणीही तसेच मिळणार आहे. वीजबील थकले म्हणून कधी उरमोडी योजना बंद पडू दिली नाही. आता मी देशातील सर्वात मोठ्या पक्षाच्या प्रवाहात आलो आहे. माढ्यात राजकीय कारकीर्द पणाला लावत भाजपचे खासदार निवडून आणले. आताही भाजपच्या नव्या, जुन्या मान्यवरांना बरोबर घेऊन वाटचाल करत आहे.
लोकसभा निवडणुकीत आत्ताचे दलबदलू भाजपसोबत नव्हते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला त्यांच्यामुळे फरक पडणार नाही. माझी संघटना सक्षमपणे उभी राहिल्यानेच दहा वर्षे आमदार झालो. आता तर आपण एकत्रित आहोत, त्यामुळे विरोधकांचा चक्रव्यूह भेदून विधानसभेत जाणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नुसतं निवडून नाही तर सर्वाधिक मतांनी विजयी करणार
पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून आम्ही भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते माण-खटाव मतदारसंघात कमळ फुलविणारच आहोत. दलबदलू आणि स्वार्थी नेते कुठेही गेले तरी काहीही फरक पडत नाही.कारण जनता ही जयकुमार गोरे यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभी असून जयाभाऊंना नुसतं निवडून नाही तर सर्वाधिक मतांनी विजयी करणार आहे, असा निर्धार खटाव तालुका भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान, खटाव आणि माण तालुका भाजप अध्यक्षांसह अनेकांनी भाजपचे कमळ चिन्हावरील उमेदवार आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.